ग्रामपंचायात निवडणूक लढविणाऱ्यांसाठी निकष व नियम
सातारा दि.22 (जिमाका): ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारी अर्ज करण्यास 23 डिसेंबरपासून सुरवात होणार असून, 30 डिसेंबर (दुपारी तीनपर्यंत) ही शेवटची मुदत आहे. मात्र, 25 ते 27 या काळात सार्वजनिक सुट्या असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवसच मिळणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांना किती खर्च करता येईल, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सात व नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत 25 हजारांची मर्यादा ठरवून दिली आहे. तर 11 ते 13 उमेदवार असलेल्या ग्रामपंचायतीतील प्रत्येक सदस्याला निवडणूक कालावधीत 35 हजारांचा खर्च करता येईल, असेही निवडणूक आयोगाने ठरवून दिले आहे. 15 ते 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांना 50 हजारांपर्यंत खर्च करता येणार आहे. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील (एससी) उमेदवारास प्रत्येकी शंभर रुपयांचे डिपॉझिट द्यावे लागणार आहे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठीही शंभर रुपयेच अनामत रक्कम असून सर्वसाधारण तथा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
निवडीसंबंधीचे निकष व नियम...
- जात प्रमाणपत्रांची पडताळणी करून वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याची प्रकिया 1 ऑगस्टपासून झाली ऑनलाइन
- एक खिडकी योजनेतून घ्यावा जात पडताळणी अर्ज; समितीला पडताळणीसाठी द्यावा लागणारा अर्ज तहसील कार्यालयाकडून घ्यावा
- जात पडताळणी समिती कार्यालयास दिलेले पत्र, जात पडताळणीसाठी दिलेली कागदपत्रे ऑनलाइन करावीत अपलोड
- उमेदवाराने ऑनलाइन जात पडताळणी प्रस्तावाची प्रत, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती व मूळ कागदपत्रे छायांकित प्रतींसह पडताळणी कार्यालयास द्यावीत
- जात पडताळणीच्या प्रस्तावाची पोचपावती, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती व वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर 12 महिन्यांत द्यावे लागणार
- एक व्यक्ती तथा उमेदवार एका प्रभागातून एकच अर्ज करू शकेल; एका प्रभागातून अधिकाधिक चार उमेदवारी अर्ज भरता येईल
- एका प्रभागात भरलेल्या अर्जांतून एक अर्ज वैध धरला जाईल; एक जरी अर्ज उमेदवाराने मागे घेतला तर त्या प्रभागातून संबंधिताने माघार घेतली असे समजले जाईल
- उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर उमेदवाराने हमीपत्र व घोषणापत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावे
- निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करीत असल्याचे हमीपत्र, अपत्यांबाबतचे घोषणापत्र, शौचालयाचा वापर करीत असल्याचे प्रमाणपत्र, अनामत रकमेची पावतीही बंधनकारक
- ग्रामपंचायतीचा थकबाकीदार व ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र व बॅंक पासबुक (राष्ट्रीयकृत तथा शेड्यूल बॅंक) द्यावे
- एका प्रभागात एक चिन्ह वाटप झाल्यानंतर तेच चिन्ह त्याच प्रभागातील दुसऱ्या उमेदवाराला मिळणार नाही; 190 मुक्त चिन्हांपैकी एक उमेदवार निवडू शकतो पाच चिन्हे
000000
कृषी उन्नती योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टलवरील योजनांच्या लाभासाठी 31 डिसेंबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन
सातारा दि.22 (जिमाका): कृषी उन्नती योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर सर्व योजनेचे अर्ज भरण्याची कार्यवाही सुरु आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर आहे. योजनांच्या लाभासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील "शेतकरी योजना" हा पर्याय निवडावा.शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक, लॅपटॉपाटॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. “वैयक्तिक लाभार्थी' म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे,मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे
No comments:
Post a Comment